कबीर बोबडे
फसवणूक झालेल्या ग्राहकांची वर्षभरात केवळ 65 प्रकरणे ग्राहक मंचाने काढली निकाली
नगर – ग्रामीणसह शहरी भागातील ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहकांना आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावता यावा म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार मंचाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांचा जिल्हा ग्राहक मंचात निपटारा होत आहे.
यंदा जानेवारी 2019 पासून ते डिसेंबर 2019 पर्यंत ग्राहक मंचाकडे 403 प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यापैकी ग्राहक मंचाने केवळ 65 जणांना ग्राहक मंचाचा दणका दिला आहे. तर उर्वरित 338 प्रकरणे अजूनही थंडबसत्यात आहेत.
ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसावा, यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापना झाली. जिल्हा ग्राहक निवारण मंचात शहर व ग्रामीण परिसरातील ग्राहकांना दाद मागता येते. किराणा माल विक्रेता, औषध विक्रेता, शीतपेय विक्रेता, ट्रव्हल एजंट, सर्व प्रकारचे व्यापारी शेतीची बियाणे, औषधे तसेच अवजारे विक्रेता, हॉस्पिटलमधील डॉक्टर्स , पोस्ट खाते किंवा कुरिअर तसेच बॅंक सेवा, दूरध्वनी, पाणी, गॉससंदर्भातील कार्यालय,, विमा कंपन्या, शेअर किंवा कर्जरोख्यांची खरेदी विक्री, एसटी, रेल्वे तसेच अन्य वाहन विक्रेते , शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, फ्लॉट अथवा प्लॉट विक्रेता, जाहिराती सादर करणाऱ्या संस्था, मॉडेल्स पोस्टर्सवरील मजकूर, आणि जाहिरात प्रसिध्द करणाऱ्या संस्था वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, बिल्डर, दूरध्वनी, वीज वितरण, विमानसेवा, रेल्वे यासारख्या विविध सेवांमध्ये झालेल्या फसवणुकीच्या विरोधात ग्राहक मंचात तक्रार करता येते.
मागच्या वर्षी 2018 मध्ये दाखल झालेल्या प्रकरणांची संख्या 390 होती, तर निपटारा झालेल्या प्रकरणांची संख्या 83 एवढी होती. सन 2018 मध्ये देखील प्राप्त झालेल्या प्रकरणे 393 एवढी होती, त्यापैकी 152 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला होता. आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, दिवसेंदिवस ग्राहक मंचाकडून निपटारा करण्यात येणाऱ्या प्रकरणांची संख्या घटत आहे. जानेवारी 2019पासून दिसेम्बर 2029 पर्यंत जिल्हा ग्राहक मंचात 403 तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.
तर या तक्रारींमध्ये 65 प्रकरणे ग्राहक मंचाने निकाली काढली आहे. यामध्ये ग्राहकाची फसवणूक केलेल्यांना ग्राहक मंचाने नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले आहे. काही प्रकरणे हि तडजोडीने सुटल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
जे प्रकरणे निकालात काढली आहेत, त्यातील बहूतेक प्रकरणांचा निकाल ग्राहकांच्या बाजूने लागला आहे. शिवाय अलिकडे ऑनलाइन खरेदी करून फसवणूक झालेल्या तक्रारींची संख्याही वाढत आहे, अशी माहिती खाजगीत कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, असे असले तरीही अजून 338 तक्रारकर्त्या ग्राहकांना ग्राहक मंचाकडून न्याय मिळू शकला नाही.