पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
नवी दिल्ली : नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाल्यानंतर काळजी करण्याची काही गरज नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
वादग्रस्त कायद्याच्या विरोधात ईशान्येकडील राज्ये सरसावली असताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आसाममधील लोकांची ओळख टिकवून ठेवली जाईल आणि ती वाढतच जाईल, असे मोदींनी इंग्रजी आणि आसामी या दोन्ही भाषांमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या कायद्यामुळे आसाममधील विशिष्ठ जीवनपद्धती, हक्क आणि संस्कृती कोणीही हिरावून घेणार नाही. ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख यापुढेही जतन केलीच जाईल आणि अधिकाधिक समृद्ध होत राहिल, असे मोदी यांनी म्हटले आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे, तसंच करुणा आणि बंधुत्व या देशाने जपलेल्या मूल्यांचे प्रतिक आहे, असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
गेली अनेक वर्षे अत्याचार सहन करत असलेल्या लोकांच्या यातना या विधेयकामुळे संपुष्टात येतील, असेही मोदी यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटले आहे. या विधेयकाच्या बाजुने मतदान केलेल्या संसदेच्या सर्व सदस्यांचेही मोदी यांनी आभार मानले आहेत.