पोस्ट खात्याकडून चांगल्या सेवेची अपेक्षा
मायणी – अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या पोस्ट खात्याला सध्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे नागरिकांच्या नापसंतीस व नाराजीस तोंड द्यावे लागत आहे. सर्व्हर डाऊनची समस्या पोस्ट खात्याने त्वरित सोडवून नागरिकांची गैरसोय टाळावी अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अनेक वर्षांपासून खेड्यापासून ते शहरापर्यंत नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून पोस्ट खात्याकडे पाहिले जाते. सध्या मोबाईल सेवा उपलब्ध झाल्यामुळे पोस्ट खात्याचे बरेचसे व्यवहार बंद झाले आहेत. तरीदेखील आजही पोस्ट खात्याच्या काही योजनांमध्ये पैसे गुंतवण्याची मानसिकता नागरिकांमध्ये असल्याचे दिसून येते.
मात्र, अलिकडे पोस्टाचे सर्व व्यवहार ऑनलाईन झाल्यामुळे नागरिकांना सर्व्हर डाऊन या समस्येस सामोरे जावे लागत आहे. सध्या बहुतांश सर्व पोस्टऑफिसमध्ये सर्व्हर डाऊनची समस्या ग्राहकांची व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांची मोठे डोकेदुखी होऊन बसली आहे.
नागरिक विविध प्रकारच्या योजनांमध्ये एक विश्वासाचे खाते म्हणून पैसे गुंतवत असतात. मात्र सदर योजनांची मुदत संपल्यानंतर पैसे तातडीने मिळत नाहीत. पोस्टात उपलब्ध असलेल्या रकमेनुसार शक्य झाले तरच पैसे मिळतात. अन्यथा पैसे मिळण्यासाठी नागरिकांना दोन-दोन, तीन-तीन दिवस थांबावे लागते. इतकेच काय एखाद्या योजनेचे पैसे भरण्यास गेले तरीदेखील सर्वर डाऊन असल्याच्या समस्येमुळे पैसे भरण्यासाठी नागरिकांना अनेक हेलपाटे पोस्ट ऑफिसमध्ये घालावे लागतात. त्यामुळे नागरिकांना फार मोठ्या मानसिक त्रासास सामोरे जावे लागते. याशिवाय त्या पोस्ट ऑफिसमधील पोस्टमास्तर रजेवर गेल्यास त्यांचा कोड नंबर त्यांच्याजागी तात्पुरती म्हणून नेमणूक केलेल्या पोस्ट मास्तरना दिला जात नाही. त्यामुळे ते पोस्ट मास्तर रजेवरून परत आल्याशिवाय त्या पोस्ट ऑफिसमधील सर्व आर्थिक व्यवहार बंद असतात. त्याचाही नागरिकांना मोठा त्रास होत असतो.
परिणामी नागरिक बचतच करावयाची असेल तर “नको रे बाबा पोस्ट, ती बॅंकच बरी’ अशा मानसिकतेत येऊन पोहोचले आहेत. प्रमुख्याने पोस्ट खात्याकडे बी.एस.एन.एल. सेवा उपलब्ध असते. मात्र बी. एस. एन. एल.ची सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्यामुळे अनेक समस्या पोस्ट खात्यास भेडसावीत आहेत. त्यासाठी बी.एस.एन.एल. खेरीज अन्य कंपनीची सेवा पोस्ट खात्याने स्वीकारली तर बॅंकेप्रमाणे ग्राहकांना पैसे सहजासहजी उपलब्ध होऊ शकतील. याबाबत पोस्ट विभाग निश्चितच काळजी घेईल व आपल्या सेवेत सुधारणा करेल, अशा प्रकारची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जाते आहे.