उमेश सुतार
मोबाइल सेवेचे तीन तेरा; ऑनलाईन कामांना खो
कराड – सातारा जिल्ह्यातील पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील कोयनानगर विभागात मोबाईल सेवेचे अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत. या विभागातील मोबाईल सेवा वारंवार खंडीत होत असल्याने याचा नाहक त्रास स्थानिकांसह मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे. अनेक महिन्यांपासून कोयना भागातील मोबाईल आउट ऑफ कव्हरेज झाल्यामुळे संपर्क करताना अनंत अडचणी येत आहेत. याचा मोठा परिणाम बॅंका तसेच शासकिय कार्यालयातील कामकाजावर होत असल्याने ग्राहक, पर्यटकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दुर्गम व डोंगराळ असा असलेल्या पाटण तालुक्यात स्वातंत्र्यानंतरही अनेक गावे सुविधांपासून वंचित राहिलेली आहेत. आजही काही गावात दळणवळणाची सोय नाही की संपर्काची साधने नाहीत. तशाच परिस्थितीत येथील ग्रामस्थांचा दिनक्रम सुरु आहे. तालुक्यातील ग्रामीण विभागात मोबाईल सेवा पोहोचली खरी, पण रेंज अभावी मोबाईल सेवेचा लाभ घेता येत नाही, याचा वाईट अनुभव ग्राहकांना येऊ लागला आहे. सध्याच्या ऑनलाईन प्रणालीने तर युवकांसह ज्येष्ठानाही चांगलेच पछाडले असल्याने मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनली आहे.
कोयनेच्या खोऱ्यात डोंगर दऱ्यात वसलेल्या गावांमध्ये मोबाईल सेवा आऊट ऑफ कव्हरेज असल्याने कोयनेसारख्या संवेदनशील ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास तेथील लोकांशी संपर्क होणे कठीण बनले आहे. मध्यंतरी वीज बील भरले नसल्याचे कारणाने फोन सेवा बंद करण्यात आली होती. तर ऐन पुरस्थितीतही कोयना धरण व सिंचन कार्यालय व भागात दूरध्वनी विस्कळीत झाल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. यासाठी या हिल स्टेशनच्या भागातील मोबाईल टॉवरची रेंज वाढविण्याच्या दृष्टीने संबंधितांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
कोयना विभागात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून या विभागातील अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन नोंदी करण्यासाठी मोबाईल देण्यात आले आहेत. मात्र याठिकाणी रेंजच नसल्याने हे मोबाईल साध्य शो पीस बनले आहेत. दिलेल्या मोबाईल बरोबर नेटवर्क येणारे सिमकार्डही देण्यात यावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांमधून केली जात आहे. ऑनलाईनची कामे करताना खेड्यापाड्यातील अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शिक्षकांना दिवसातून तीन ते चार वेळा नेटवर्कची शोधाशोध करत रानोमाळ भटकावे लागत आहे. तर शासकीय कार्यालयातील कर्मचारीही वारंवार खंडीत फोन सेवेने त्रस्त झाले आहेत. सुट्टी व कार्यालयीन कामकाजा व्यतिरिक्त नेटवर्क असेल तेथे जाऊन कर्मचाऱ्याना काम करावे लागत आहे. त्यामुळे सध्या मोबाईलवर रिचार्ज मारूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्राथमिक शाळा, अंगणवाडी, बालवाडी, स्वस्तधान्य दुकान, बॅंका, महा ई-सेवा, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी फोन सेवेसह इंटरनेट अत्यावश्यक आहे. पण याला कोयना विभाग अपवादच ठरला आहे. मोबाईलच्या या विस्कळीत झालेल्या या सेवेमुळे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकिय कार्यालयात काम करणारे कर्मचाऱ्यांना आउट ऑफ कव्हरेजफ चा चांगलाच फटका बसत आहे. रेंज अभावी महत्वाचे मेल, मेसेज वेळेत पोहच नसल्याने अनेकांच्या कामांना अक्षरशः खो बसला आहे.