सद्यस्थितीत धरण 50 टक्के रिकामे
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी एक असलेले टेमघर धरण रिकामे करून धरण दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाने पुन्हा हाती घेतले जाणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार धरणाच्या बाहेरील भितींवर ग्राऊटिंग आणि ड्रिलिंगचा वापर करून गळती रोखण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर धरणाच्या आतील बाजूस सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे. टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामासाठी धरण रिकामे असणे आवश्यक असल्याने टेमघर धरणातून शहराच्या गरजेनुसार खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येत आहे. सद्यस्थितीत टेमघर धरण 50 टक्के रिकामे करण्यात आले आहे.
टेमघर धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. तेव्हांपासून धरणात पाणीसाठा करण्यात सुरुवात झाली आहे. मात्र पाणी साठवण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांतच धरणातून गळती सुरू झाली. 2016 मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बाब जलसंपदा विभागाने गांभार्याने घेतली. धरणातून पाणी गळतीचे प्रमाण प्रति सेंकद 2 हजार 500 लिटर एवढे होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. ही गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने सेवानिवृत्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. यासमितीने अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना सूचवल्या. त्यानुसार गळती रोखण्यासाठी ग्राऊटिंगचे काम करण्यात आले.
यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दुरुस्ती बंद ठेवण्यात आले. धरणातून गळती होत असल्याने टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. यापूर्वी धरण 60 ते 70 टक्के इतकेच भरले जात होते. यंदा पहिल्यांदाच धरण 100 टक्के भरण्यात आले होते. त्यानुसार टेमघर धरणात 3.71 टीएमसी इतका पाणीसाठा करण्यात आला होता. आता धरण दुरुस्तीच्या कामामध्ये प्रामुख्याने ग्राऊटिंगचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये धरणाबाहेरील भितींमध्ये सिमेंट, फ्लाय ऍश आणि सिलिका यांचे मिश्रण एका विशिष्ट दाबाने सोडण्यात येते. त्यामुळे धरणाच्या भितींमधील पोकळ्या भरून येतात, असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम नाही
शहराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. वरसगाव, पानशेत आणि टेमघर या तीन धरणांमधून टप्प्याटप्याने शहरासाठी खडकवासला धरणात पाणी सोडले जाते. टेमघर धरण दुरुस्तीचे काम करण्यासाठी आधी धरण रिकामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राधान्याने टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरण लवकर रिकामे होऊन दुरुस्तीचे काम सुरू करता येणार आहे. टेमघर धरण लवकर रिकामे केल्याने त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.