इंदूर : भारत विरूध्द बांगलादेशदरम्यान इंदूर येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांमध्ये कोसळला. बांगलादेशला झटपट गुंडाळल्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात २६ षटकांत १ बाद ८६ धावांपर्यत मजल मारली आहे. भारत अजूनही ६४ धावांनी पिछाडीवर आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ६ धावांवर तबूंत परतला. त्याला बांगलादेशचा गोलंदाज अबु जाएदने झेलबाद केले. त्यानंतर पूजारा आणि अग्रवालने भारताचा डाव संभाळला व आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मयंक अग्रवाल ३७ आणि चेतेश्वर पूजारा ४३ धावांवर खेळत होता.
A solid 72 run-partnership between Mayank (37*) & Pujara (43*) as #TeamIndia close Day 1 on 86/1 after bowling Bangladesh out for 150.
Scorecard – https://t.co/0aAwHDwHed #INDvBAN pic.twitter.com/q2uhSBW5j3
— BCCI (@BCCI) November 14, 2019
तत्पूर्वी, बांगलादेशने मालिकेतील पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, वेगवान गोलंदाज उमेश यादव याने इमरूल केस (०६) आणि इशांत शर्मा याने शदमन इस्लाम (६) या दोघाही सलामीवीरांना माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मोहम्मद मिथुन यास मोहम्मद शमीने १३ धावांवर बाद केले. त्यावेळी बांगलादेशची ३ बाद ३१ अशी अवस्था झाली होती.
त्यानंतर मोमिनुल हक आणि मुशफिकुंर रहीमने बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण मोमिनुल हक ३७ आणि मुशफिकुर ४३ धावांवर बाद झाल्यावर बांगलादेशचा एकही फलंदाज खेळपट्टीवर फार काळ टिकू शकला नाही. त्यामुळे बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर आटोपला.
भारतीय गोलंदाजीत पहिल्या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने १३ षटकांत २७ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर उमेश यादवने (४६/२) आणि इशांत शर्माने (२०/२) गडी बाद केले. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने १६ षटकांत ४३ धावा देत २ गडी बाद केले मात्र रविंद्र जडेजाला एकही गडी बाद करता आला नाही.