राज्यपालांनी उशीराने प्रक्रिया सुरू केली : राष्ट्रवादी कॉंग्रेस
मुंबई: विधानसभेत शक्तिपरीक्षा झाल्यास भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. तसेच, शिवसेनेने भाजपच्या विरोधात मतदान केल्यास पर्यायावर विचार करण्याचे सूतोवाचही त्या पक्षाने केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.
त्यानुसार सरकार स्थापण्याचा निर्णय घेतल्यास भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यामुळे भाजप शक्तिपरीक्षेला सामोरा जाणार की नाही याबाबतची उत्सुकता बळावली आहे. त्यापार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका मांडली. सरकार स्थापनेबाबतची प्रक्रिया राज्यपालांनी उशीरा सुरू केली.
त्यांनी आधीच कृती करायला हवी होती. आता भाजपने शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यास घोडेबाजार होणार नाही याची निश्चिती राज्यपालांनी करावी, असे मलिक यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेनेबरोबर जाण्याचा पर्याय राष्ट्रवादीने खुला ठेवला असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कॉंग्रेसने मात्र अजूनही पत्ते खोललेले नाहीत.
भाजप आणि शिवसेना एकत्र राहून महायुतीचे सरकार स्थापन करणार का, याविषयीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन नवी समीकरणे बनू शकतात, असे तर्क-वितर्क काही दिवसांपासून सुरू आहेत.