प्रशासनाची बघ्याची भूमिका; नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
कराड – उंब्रज-चाफळ राज्य मार्गावरील कळंत्रेवाडी ते चरेगाव (चाफळ फाटा ) तसेच पुढे चाफळ रोडवरील खालकरवाडी या परिसरातील नागरिक भटक्या वळुंच्या वावरामुळे त्रस्त आहेत.
याबाबत सविस्तर माहितीनुसार, कळंत्रेवाडी ते खालकरवाडी या परिसरामध्ये तीन ते चार वळू बैल तसेच गाई यांचा वावर वाढला आहे. परिसरातील ऊस, मका, भुईमूग, घासगवत तसेच इतर भाजीपाल्यांच्या पिकांमध्ये घुसून कितीतरी एकर क्षेत्रावरील पिके फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होत असून देशोधडीला लागायची वेळ या परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच या परिसरात असणाऱ्या गाईंच्या गोठ्यांवरही वळूंचा वावर रात्रीच्यावेळी वाढला असल्याने नागरिकांना रात्रपाळी करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी हे वळु बेधुंद होऊन मादी जातीच्या जनावरांवर हल्ले करतात.
साधारणपणे ह्या वर्षामध्ये शिवाजी माने, सदाभाऊ इंगळे व मोहन सुर्यवंशी यांच्या प्रत्येकी एक प्रमाणे तीन गाई वळुंच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या विभागातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी पंचनाम्यासाठी फिरकले नाहीत. चाफळ फाटा तसेच खालकरवाडी चौकात असणाऱ्या वळणावर राज्य मार्गावरच हे वळू बसलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी वरचेवर वाहतूकीचा बोजवारा उडत आहे.
रात्रीच्यावेळीही रस्त्यावर बसलेले वळू दिसत असल्याने भविष्यात एखाद्या दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या परिसरातील तरूण शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय वळूंच्या सततच्या वावरामुळे तसेच अडचणीत आला आहे. वळूंना पकडून सुरक्षितपणे एखाद्या अभयारण्यात किंवा गोशाळेमध्ये स्थलांतरीत करणे गरजेचे असताना संबंधित वन विभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच पोलीस प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.