पुरंदर – तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून कधी मुसळधार तर कधी संततधार असा पाऊस चालू असल्यामुळे तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, भुईमूग, मका, कांदा ही पिके अक्षरशः सडलेली असून, बाजरीच्या कणसांची कापणी पूर्ण झालेली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे बाजरीच्या कणसांना अक्षरशः कोंब फुटले आहेत. कांदा जमिनीतच सडलेला आहे आणि भुईमुगाच्या शेतात पाणी साचल्यामुळे भुईमुगाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
पावसाचा जोर अजूनही कायम आहे यामुळे तालुक्यातील भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भाजी मंडईतील भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. घटलेल्या आवकेमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. एकीकडे शेतकरी नुकसानीने हवालदिल झाला असताना तालुक्यातील मध्यमवर्गीयांचे महिन्याच बजेट कोलमडले आहे. याकडे प्रशासनाचे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. एकंदरीत पुरंदर तालुक्यातील सध्याची परिस्थिती पाहता तालुक्यात राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पुरंदर तालुक्याला सध्या पावसाने झोडपले असून, तालुक्यातील शेतात पाणी साचून शेताचे तळ्यांमध्ये रूपांतर झाले आहे. फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासकीय पंचनामे वेळेत होत नाही, त्यामुळे नुकसान भरपाई बाबतही शासंकताच आहे काही शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये विम्याचे हप्ते पैसे भरलेले असूनही त्या बाबतीतही कोणताही संपर्क होत नाही शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शेतात कमरेभर पाणी साचलेले आहे.
काही ठिकाणी शेतांचे बांध फुटून शेतातील माती व पिके सर्वच वाहून गेले आहे. तालुक्यातील सुपीक जमिनी मुरमाड बनत चालले आहेत क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामाच्या पिकांवर ती मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, सतत बरसणाऱ्या पावसामुळे गव्हाच्या पेरण्या देखील लांबणार असून, यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जाणार का, अशी दाट शंका निर्माण होऊ लागली आहे.
शासकीय पंचनामे करण्याकरता शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे व चिखलाचे प्रमाण अधिक असल्यामुळे शेतशिवारापर्यंत पोहोचण्यास शासकीय अधिकाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, यामुळे शासकीय पंचनामे करण्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, यामुळे शासकीय पंचनामान्यास मर्यादा निर्माण होत आहेत.