कॉंग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत आज टिळक भवन येथे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक निकालाचीही चर्चा करण्यात आली. या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.
आज ठरणार कॉंग्रेसचा विधीमंडळ पक्षनेता
उद्या गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. टिळक भवन दादर मुंबई येथे कॉंग्रेसच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत कॉंग्रेसचा विधीमंडळ पक्षनेता ठरवला जाणार आहे.
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल चर्चा करण्यात आली. राज्यात अद्यापही पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले खरीप पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील भात शेती उद्ध्ववस्त झाली आहे. फळबागांसह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी दुष्काळात होरपळेला शेतकरी सावरण्यापूर्वीच तो ओल्या दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे सरकारने तत्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.