मुंबई : युतीत राहण्यातच महाराष्ट्राचे हित आहे. त्यामुळे सर्व काही ठरल्याप्रमाणे झाल्यास राज्याला निश्चितच पाच वर्षे स्थिर सरकार मिळेल, त्याच बरोबर सत्तेतील वाट्याबाबत लिखित प्रस्तावाची मागणी कायम असल्याची भूमिका शिवसेनेने बुधवारी मांडली. त्यामुळे पदासाठी दबाव न टाकण्याचे संकेत दिल्याचे राजकीय निरीक्षक मानत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याची दिलेल्या ग्वाहीचे शिवसेनेने स्वागत केले.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, महाराष्ट्राची कुंडली शिवसेनाच बनवणार आहे. कुठले ग्रह कुठे ठेवायचे, कुठले तारे जमिनीवर आणायचे, कुठले चमकावायचे याची ताकत शिवसेनेमध्ये आहे. सरकार स्थापनेची घाई करुन चालणार नाही. शातं, थंड डोक्याने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन काही निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी उद्धव ठाकरे समर्थ आहेत. ठरल्याप्रमाणे सगळे घडले तर येणारे सरकार स्थिर असेल असे राऊत म्हणाले.पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेसंबंधी लिखित स्वरुपात प्रस्ताव द्या असे सांगितले होते. त्यामुळे ती पक्षाची भूमिका आहे.
शिवसेनेचे 23 आमदार भाजपसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता हा आकडा कुठून आणला? मग आमदार संपर्कात आहेत असंच का नाही म्हणत, असा सवाल राऊत यांनी केला. आता तुम्ही पुडी सोडताय म्हणून मी सुद्धा पुडी सोडतोय. आज सकाळपासून भाजपचे 60 आमदार आम्हाला संपर्क साधत आहेत!, अशी टोलेबाजीही राऊत यांनी केली. याक्षणी महाराष्ट्रातील एकाही पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, ही माझी खात्री असल्याचेही राऊत पुढे म्हणाले.
दरम्यान गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांचे आभार मानले. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य करु असे ते यावेळी म्हणाले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, संविधानाच्या अनुरुप राज्य चालवायचे असल्याचे सांगत गेल्या वर्षांपेक्षा अधिक चांगले काम करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.