पीक काढणी लांबणीवर : अवकाळीमुळे “कहीं खुशी, कहीं गम’
मावळ – लांबलेला मान्सून आणि परतीच्या पावसाची “गर्जना’ मावळातील भातशेतीला संकटाच्या खाचरात अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हंगामातील समाधानकारक पावसाची नोंद असली तरी खाचरे बहरली.तरी बहुतेक ठिकाणची शेती अवकाळी फेऱ्यात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळी वारासह कोसळणारा पाऊस ओंबीवर आलेल्या पिकांच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. नाणे मावळ, पवन मावळ आणि आंदर मावळातील काही भागात भात काढणीसाठी आले आहेत.
ढगाळ वातावरणामुळे अगोदर लागवड झालेला शेतीला अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता गडद झाली आहे. तालुक्यातील 15 हजार 647 हेक्टरपैकी 13 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. त्यापैकी 12 हजार 464 हेक्टरवर भातपीक आहे. मावळात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडपट पाऊस झाला आहे. पावसामुळे खरीप हंगाम जोरात आहे.
आमची भात पिके कापणीस आलेली आहेत; मात्र अद्याप पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळले नाही. कधीही पाऊस येऊ शकतो, असे ढगाळ वातावरण असल्याने कापणी केल्यास नुकसान होण्याची शक्यता दिसते. कापणीसाठी पाऊस पूर्णपणे उघडण्याची वाट पहावी लागते आहे.
– रमेश भुरुक, शेतकरी, नाणे मावळ.
भात कापणीची शेतकऱ्यांनी घाई करू नये, तसेच कापणी केल्यास कापलेली पिके गंजी लावून झाकून ठेवावीत आणि भात खाचरातील पाणी बाहेर काढावेत.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषि अधिकारी.