धनंजय घोडके
भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादीसाठी वर्चस्व टिकवण्याची
वाई – वाई विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत आमदार मकरंद पाटील व मदन भोसले यांच्यात आहे. आबा- दादा यांच्यात तिसऱ्यांदा लढत होत आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर राष्ट्रवादीसाठी वर्चस्व टिकवण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. येथील अटीतटीच्या झुंजीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेकडे होता. मात्र, हा मतदारसंघ भाजपकडे खेचून घेत मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेचीही केली आहे. या मतदारसंघात इतर आठ उमेदवारांचा फटका कोणाला बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोनच दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना वातावरण बदलून गेला आहे, कोपरा सभा आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजत आहेत. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. जाहीर सभांमधून दोन्ही तुल्यबळ उमेदवारांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतल्याने राजकीय हवा गरम झाली आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. उर्वरित आठ उमेदवारांचा फटका दोघांपैकी कोणाला बसणार आणि कोणाला फायदा होणार, याचे उत्तर निकालादिवशी मिळेल. मात्र, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. पुरुषोत्तम जाधवांनी दोन वेळा निवडणूक लढवून मदन भोसलेंच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलला होता. यंदा त्यांनी माघार घेतल्याने मदन भोसलेंना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादीचे खंडाळा तालुक्यातील पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे मकरंदआबांना किती नुकसान सोसावे लागेल, याबाबत चर्चा होत आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये आबांचे मताधिक्य वाढले होते. गेल्या वेळी ते तब्बल 38 हजार मताधिक्याने निवडून आले होते. यंदाही त्यांचे आव्हान विरोधकांना पेलवणार का, हा प्रश्न आहे. वाईच्या सभेत त्यांनी मदन भोसले यांच्यावर कडाडून टीका करताना विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा विश्वास व्यक्त केला होता. भाजपवासी झालेल्या मदन भोसले यांची ही चौथी निवडणूक आहे. शेतकरी हितासाठी आपल्याला राजकीय किंमत मोजावी लागल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. दादांना गतवेळीच भाजपमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला होता; पण कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केल्याने ते पुन्हा कॉंग्रेसच्या तिकिटावर लढले होते.
एक वर्षापूर्वी खंडाळा कारखान्यावर मुख्यमंत्री आले असताना मदन भोसले यांनी आपल्यासोबत काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांना मदन भोसले यांनी विचारणा केल्यावर सर्वांनी “भाजप, भाजप’ अशा घोषणा दिल्या होत्या. अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी लाटेवर स्वार होत, भाजपप्रणित रालोआने सत्ता राखून दोन तृतीयांश बहुमत मिळवले. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे भाजपने वाईतून मदानदादांना उमेदवारी दिली. दादांचे संस्थात्मक काम मोठे आहे.
शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव व डी. एम. बावळेकर आणि रिपाइं यांची साथ मदनदादांना लाभत आहे. त्यामुळे ते मकरंदआबांना कडवी लढत देतील, अशी चर्चा आहे. मदन भोसले यांच्याकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी नसली तरी भाजपने गेल्या काही वर्षांपासून गावपातळीवर आपली वेगळी यंत्रणा उभी केली आहे. त्याचा लाभ मदनदादांना होणार का, हादेखील प्रश्न आहे. एकंदरीत हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने लढत रंगतदार होणार, हे निश्चित.