हेमंत देसाई
अमेरिकेच्या दहशतवादविरोधी युद्धामुळे मुस्लिमांमधील कट्टरता वाढली, अशी टिप्पणी इम्रान यांनी युनोतील भाषणात केली. परंतु अफगाणिस्तानमधील रशियनांना हुसकावून लावण्यात अमेरिकेबरोबर पाकिस्तानही सामील झाला होता, हे मात्र इम्रान खान नेमके विसरले.
दहशतवादाचा धोका कुणा एका देशालाच आहे, असे नव्हे. त्यामुळे या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट दाखवण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनो, म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील आपल्या भाषणात केले. त्यांचे तेथील पहिले भाषण 2014 मध्ये झाले होते. वेगवेगळ्या जागतिक व्यासपीठांवरून भारताने गेली पाच वर्षे हेच आवाहन केले आहे. भारताने 1996 मध्ये सर्वंकष आंतरराष्ट्रीय दहशतवादविषयक जाहीरनाम्याचा मसुदा युनोला सादर केला होता; परंतु त्यावर सदस्य देशांचे एकमत झाले नाही. दहशतवादाला तसेच त्याला आश्रय देऊन अर्थसाह्य करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याची शिफारस त्यात आहे.
वास्तविक अनेक देशांना दहशतवादाचा धोका असला, तरी त्याविरोधात युनोच्या सदस्यांमध्ये एकजूट होत नाही. याचा अर्थच असा की, युनोची स्थापना ज्या तत्त्वांवर झाली, त्याला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदी यांची भेट झाली होती. तेव्हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुकाबला करण्यास, मोदी सक्षम आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. पाकिस्तानला जो काही “संदेश’ द्यायचा आहे, तो भारताने दिलेलाच आहे, असेही त्यांनी सूचित केले होते. मोदी हे रॉकस्टार एल्व्हिस प्रेस्लेप्रमाणे जनतेला मंत्रमुग्ध करू शकतात आणि ते भारताचे राष्ट्रपिता आहेत, अशी स्तुतिसुमनेही ट्रम्प यांनी उधळली आहेत.
ट्रम्प यांचे एकूण जगाबद्दलचे अगाध ज्ञान लक्षात घेता, त्यांना भारताचे एकमेव पिता महात्मा गांधी आहेत, हे ठाऊक असायचे कारण नाही आणि पुन्हा निवडून येण्यासाठी अमेरिकेतील भारतीयांची मते मिळवण्यासाठी त्यांनी केलेली ही उक्ती आहे. भारताने जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिला, हे मोदी यांचे विधान यथायोग्यच ठरते. संभाजी भिडे यांनी त्यांच्यावर टीका केली असली, तरी ती कोणत्याही प्रकारे दखलपात्र नाही. नेहरू यांनी जगात शांततावादाचाच पुरस्कार केला आणि त्यानंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने हेच धोरण स्वीकारले.
परराष्ट्रनीतीत सातत्य असले पाहिजे आणि शांततावाद म्हणजे भ्याडपणा नव्हे, हे आपण अनेकवार युद्धामध्ये पाकिस्तानला चोप देऊन सिद्ध केले आहे. मोदी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तान व काश्मीरचा उल्लेखही केला नाही, हे बरेच झाले. तसेच 370वे कलम मोडीत काढणे, हा भारताचा अंतर्गत मामला आहे आणि त्याची जागतिक मंचावर चर्चा करण्याचे कोणतेही कारण नाही.
युनोमध्ये पाकिस्तानशी त्याच मुद्द्यांवरून भांडण करण्याऐवजी, मोदी यांनी हवामानबदल, दारिद्य्र निर्मूलन, नवीकरणीय ऊर्जा यासारखे विषय हाताळले, हे बरेच झाले. भारताने जगातील सर्वांत मोठी स्वच्छता मोहीम राबवून 11 कोटी स्वच्छतागृहे बांधली. आधार योजनेतून जगातील सर्वांत मोठी डिजिटल ओळख मोहीम राबवली. त्यातून भ्रष्टाचाराला आळा बसून, 20 अब्ज डॉलरची बचत झाली. आयुष्मान भारत योजना, ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना आहे. त्यात 50 कोटी लोकांना वार्षिक प्रत्येकी पाच लाख रुपयांचे मोफत वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.
2022 मध्ये भारत स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी पूर्ण करत असून पाच वर्षांत सव्वा लाख किलोमीटरचे रस्ते बांधले जातील तसेच दोन कोटी गरिबांना घरे दिली जातील. 2015 पर्यंत क्षयरोगाचे पूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य आहे. युनोच्या व्यासपीठावरून मोदी यांनी भारत सकारात्मक दिशेने कशा पद्धतीने जात आहे, याची चर्चा करून, चांगले संकेत दिले. मात्र हवामान बदलाबद्दल जगाला उपदेश करताना, यावेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात “नॅशनल ऍडॅप्टेशन फंड फॉर क्लायमेंट चेंज’साठी फक्त 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ही रक्कम 2017-18च्या तुलनेत 16 टक्क्यांनी कमी आहे.
भारताच्या तुलनेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषण अत्यंत कनिष्ठ स्तराचे झाले. काश्मीर प्रश्नात जागतिक समुदायाने हस्तक्षेप केला नाही, तर आण्विक संघर्ष व रक्तपात होईल, असा इशारा त्यांनी दिला. वास्तविक आज पाकिस्तानमधील लाखो लोकांची उपासमार होत आहे. महागाईने तेथे कळस गाठला असून, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे पेकाट मोडले आहे. इम्रान खान यांच्या अमेरिकन वारीचा खर्चही पाकिस्तानला परवडत नाही. तेव्हा आण्विक संघर्षाची धमकी देऊन, भारताला पोकळ इशारे देण्याचे कारण नाही. भारत यास सडेतोड उत्तर देण्यास समर्थ आहे. काश्मीरमध्ये गुजरातसारखे जातीय दंगे होतील, अशी भीतीही त्यांनी दाखवली. खरे तर पकिस्तानात असंख्य हिंदू व शिखांवर जे अत्याचार होत आहेत, त्याबद्दलचा जबाब त्यांनी द्यावा.
झिया उल हक यांनी पाकिस्तानचे इस्लामीकरण करून, जहाल पंथीयांना खतपाणी घातले. तसेच ओसामा बिन लादेन आणि त्याची अल-कायदा ही संघटना यांना पाकिस्तानी लष्करानेच प्रशिक्षण दिले. त्यानंतरच 9-11चा अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यांना मुस्लीम व इस्लाम हे जबाबदार आहेत, असे म्हटले जाते; परंतु 9-11पूर्वी तामिळ वाघांनी आणि जपानमधील “कामिकेझ पायलट्स’ यांनीही अशा प्रकारची कृत्ये प्रथम सुरू केली’, असा उल्लेखही खान यांनी केला. मात्र, तामिळ वाघांपूर्वीदेखील जगात ठिकठिकाणी इस्लामी अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता, हे नाकारता येणार नाही. इस्लामी धर्म हा शांतीचाच संदेश देतो. परंतु या धर्माचा चुकीचा वापर करूनच तरुणांची माथी फिरवली जातात. हे इराण, इराक, सीरिया, सौदी अरेबिया, येमेन अशा ठिकठिकाणी दिसून आले आहे.
अगदी चीन वा रशियातही काही भागांत इस्लामी कट्टरवाद्यांचा उपद्रव सुरू आहे. तेव्हा केवळ भारतास लाखोली वाहून चालणार नाही. इम्रान खान यांनी
स्वतःच्या पायाखाली काय जळते आहे, ते पाहावे आणि मुख्य म्हणजे, ते स्वतः केवळ लष्कराचे एक प्यादे आहेत. भारताच्या तुलनेत पाकिस्तान हा एक लहान देश आहे. त्यामुळे फुत्कार सोडण्यापलीकडे तो काहीएक करू
शकत नाही.