शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे- नगर रस्त्यावर दररोज होत असलेली वाहतूक कोंडी हा चर्चेचा विषय बनला आहे. अखेर आज सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे वाहतूक कोंडीने गुदमरलेल्या पुणे- नगर महामार्गाने मोकळा श्वास घेतला.
कोरेगाव भीमा व परिसरात दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे आणि रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे पाणी रस्त्यावर साचल्याने रस्त्यावर पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु पाणी जाण्यासाठी असलेल्या गटार लाईन बंद झाल्या होत्या. त्यामुळे पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत होता. रस्त्यावरील खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनचालकांचा अपघात झाला होता. त्यामुळे नगर महामार्गावर वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागलेल्या होत्या. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन प्रवासी व नागरिकांचे हाल झाले होते. ही वाहतूक कोंडी सोडविणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले होते.
परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत होते. याबाबत पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामपंचायत व बांधकाम विभागास उपाययोजना करण्याचे पत्र दिले होते. त्यानतर सकाळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता उज्ज्वला घावटे, शाखा अभियंता नवनाथ शेळके आदींनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी साचलेले पाणी बाजूला करण्यासाठी टॅंकरचा वापर करण्यात आला. सकाळी दहानंतर वाहतूककोंडी सुरळीत झाली. रस्त्यावर तसेच कडेला साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी गटार लाईनचे काम सुरू करीत आहे. कोठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेत रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविणार असल्याचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके यांनी सांगितले.
कोरेगाव भीमाकरांना गुरूवारचा विसर
कोरेगाव भीमा येथील होणारी वाहतूककोंडी चर्चेचा विषय असला तरी या वाहतूककोंडीमध्ये येथे गुरुवारी असलेल्या आठवडे बाजाराची भर पडत होती. परंतु आता वाहतूक कोंडी हटविण्यासाठी आजपासून बाजार हा ग्रामपंचायतच्या नव्याने बनविण्यात आलेल्या जागेत स्थलांतरीत करण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर गर्दी दिसत नसल्यामुळे कोरेगाव भीमाकरांना गुरुवारचा विसरच पडल्याचे दिसून आले.
कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या वाहतूककोंडीमध्ये रस्त्याचे कडेला असलेले अतिक्रमण कारणीभूत आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे. त्या अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास आम्ही अतिक्रमण काढून टाकणार असल्याचे
– नवनाथ शेळके, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.