श्रीनगर : काश्मीरच्या बहुतेक भागात शुक्रवारी लागू करण्यात आलेले सार्वजनिक वावरावरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मात्र कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारा भागातील निर्बंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत.
इंटरनेट आणि दूरसंचार सेवांवरील निर्बंध आणि कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश मात्र सर्वत्र लागू राहणार आहेत अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. तसेच सार्वजनिक ठिकाणी तैनात करण्यात आलेला सुरक्षा बंदोबस्तही कायम ठेवण्यात आला आहे. सरकारने कलम 270 रद्द करण्याचा निर्णय घेऊन आज 48 दिवस झाले आहेत. मात्र काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळेच या भागातील अनेक मशिदींमध्ये शुक्रवारच्या सामुहिक प्रार्थनांवरही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हजरतबल येथील दर्गा आणि नौहट्टा भागातील जामीया मशिदीतील प्रार्थना होऊ शकल्या नव्हत्या. या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य स्थिती मात्र शांत राहिली. कोठेही मोठा अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.