आ. आनंदराव पाटील : संघर्ष करून पुन्हा संघटनात्मक बांधणी करणार
भाजपमध्ये जाण्याची हूल
मी माझ्या बंधूच्या कामासाठी मंत्रालयात ना. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी गेलो होतो. मात्र बाबांच्या भोवती असलेल्या कोंडाळ्यांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याची हूल उठवली आहे.
कराड – स्व. प्रेमलाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी संघटना उभी करुन जिल्ह्यात लढत होतो. आता मात्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या भोवती लायकी नसलेल्यांचे कोंडाळे निर्माण झाली आहे. त्या कोंडाळ्याशी संघर्ष करून पुन्हा संघटनात्मक बांधणी करणार असून आता मी गप्प बसणार नाही, असा इशारा आ. आनंदराव पाटील यांनी दिला.
विजयनगर, ता. कराड येथे शुक्रवारी कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, ऍड. ए. वाय. पाटील, विजयराव चव्हाण, निसार मुल्ला, हेमंत जाधव, ऍड. प्रतापराव देशमुख, आपासाहेब गायकवाड, झाकीर पठाण, हरिभाऊ जोशी, सुनील पाटील, हरिभाऊ जोशी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, मी चाळीस वर्षापासून पक्षात काम करत आहे. मात्र, आ. पृथ्वीराज चव्हाण यांची दिशाभूल करून त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. अशा पद्धतीचे कोंडाळे त्यांच्या भोवती तयार झाले आहे. कराड दक्षिणमध्ये होणाऱ्या मेळाव्यामध्ये माझा उल्लेख टाळला जात आहे. मला बोलूही दिले जात नाही. कोणामुळे आपण अध्यक्ष झालो, आपल्याला पदे कशी मिळाली, हे लोक विसरत आहेत. मात्र, पिंडीवरील विंचू मारता येत नाही अशी अवस्था झाली आहे. चळवळीत काम केलेला मी कार्यकर्ता असल्याने याची परवा मी कधीही करणार नाही. पक्षात कोंडाळे निर्माण झाले आहे. त्यांनी आमच्या नेतृत्वाला घेरले आहे. तसेच त्यांना माझ्यापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. मात्र, मी या असल्या लोकांकडे लक्ष न देता जिल्ह्यात नव्याने संघटना बांधून पुढे जात राहणार आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल, तर हा आ. आनंदराव पाटील गप्प बसणार नाही, असे ठणकावून त्यांनी सांगितले.
जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे म्हणाले, आमच्या नेत्यांवर कोणते चेटूक केले हे समजत नाही. मी तीन दिवसापासून हा सुरू असलेला प्रकार मिटवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण संघटनेत अशी फूट पडू लागल्याने हे पक्ष दृष्टीने घातक आहे. बाबांनी पुढाकार घेऊन हे थांबवणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यकाळासाठी हे पक्षासाठी चांगले ठरणार नाही. आमच्या रक्ता-रक्तामध्ये कॉंग्रेस आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आपापसातल्या साठमाऱ्या थांबल्या पाहिजेत. तसेच नेत्यांनी समजून घेऊन यामध्ये योग्य तो मार्ग काढला पाहिजे. तरच सामान्य कार्यकर्त्यांची ससेहोलपट थांबेल. या संवाद मेळाव्यात आ. आनंदराव पाटील जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपर्यंत राहू असा सूर उमटला.