मुंबई – कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री आणि भाजप प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी कॉंग्रेसबाबत नाराजी व्यक्त केली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगत होत्या, आज अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल. आमच्यासारख्या अन्यायग्रस्तांना भाजपचाच आधार आहे. मी कोणतीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही. माझ्यावर पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती प्रत्येक जबाबदारी मी पार पाडेल.” पाच वर्षात मुख्यमंत्र्यांचा चेहरा कायम हसतमुख राहिला आहे. आता हर्षवर्धन आल्याने हे हास्य अधिक वाढेल, अशी मिश्कील प्रतिक्रीयादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हर्षवर्धन यांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, भाजप हा एका परिवाराचा पक्ष नाही. ज्यांना निष्ठेने वागायचे आहे. त्यांना आता भाजपशिवाय पर्याय नाही. हर्षवर्धन यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला नक्की होईल. येत्या काळात युतीच निवडून येईल, आणि आता त्यात इंदापूरच्या जागेचाही समावेश असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.