जीनिव्हा -पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरचा उल्लेख भारतीय राज्य म्हणून केला. त्यामुळे काश्मीरवर वक्रदृष्टी ठेवणारा पाकिस्तान वरवर दाखवत नसला; तरी मनातून तो भाग भारताचा असल्याचे मान्य करत असल्याचे चित्र निर्माण झाले.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भाषण करताना कुरेशी यांनी भारतविरोधी मोठा आकांडतांडव केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जणू काश्मीर हा भारताचा भाग असल्याचे सत्य अधोरेखित केले.
काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे जगासमोर भासवण्याचा प्रयत्न भारत करत आहे. तसे असेल तर सत्याची पडताळणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं, एनजीओ आणि नागरी संघटनांच्या प्रतिनिधींना त्या भारतीय राज्यात जाऊ का दिले जात नाही, असा सवाल कुरेशी यांनी केला.
पाकिस्तानकडून आतापर्यंत काश्मीरचा उल्लेख भारताचे प्रशासन असलेला भाग म्हणून केला जात होता.