नवी दिल्ली: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रातल्या “सेझ’च्या म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्रांच्या स्थितीची आढावा बैठक सह्याद्री अतिथी गृह येथे काल घेतली. “सेझ’मधील व्यवसाय अधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची गरज आहे, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले.
“सेझ’क्षेत्राचा पूर्ण क्षमतेने वापर केला जावा, यासाठी व्यवसाय स्नेही आणि उद्योगांना पुरक वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे. सध्याची नियमांची चैकट व्यवसाय वृद्धीसाठी अडसर ठरत असेल तर त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्यात येईल. यासाठी महसूल खात्याशीही विचार-विनिमय करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
सन 2018-19 आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या “सेझ’मध्ये 1,13,734 कोटींची उलाढाल झाली. ही उलाढाल राज्याच्या गेल्यावर्षीच्या निर्यातीच्या तुलनेत जवळपास 20 टक्के जास्त आहे. “सेझ’मधल्या मौल्यवान रत्ने आणि आभूषणांच्या निर्यात विभागात जवळपास 10 टक्के वाढ दिसून आली आहे. तसेच जैव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये 11.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धी झाली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.