राज्यात एक लाखापर्यंतची मालवाहतूक ई-वे बील मुक्त
मुंबई (प्रतिनिधी) – छोट्या व्यापाऱ्यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात एक लाख रुपयांपर्यंत माल वाहतुकीवर ई-वे बील आकारण्यात येणार नाही. इतर राज्यात ई-वे देयकासाठी 50 हजार रुपयांपर्यंतच्या मुल्याच्या मालाची मर्यादा असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
कर चुकवेगिरीला आळा बसावा या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत ई-वे बिलची अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज्यात ई-वे बिल प्रणाली 1 एप्रिल 2018पासून लागू झाली. त्यानंतर आतापर्यंत 11 कोटी 92 लाख 57 हजार 315 इतकी ई-वे देयके तयार झाली आहेत. जून महिन्यातच 77 लाख 41 हजार 407 इतकी ई-वे देयके तयार झाली आहेत. ई-वे देयक निर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी आहे. यात राज्यनिहाय ई-वे देयक देण्याची आवश्यकता नसते. संपूर्ण देशात एकच ई-वे देयक वापरता येते. वेगवेगळ्या तपासणी नाक्यांवर वाहने न थांबवल्यामुळे मालाची वाहतूक मुक्त होऊन वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराज्य माल वाहतूक करताना देशात सर्वत्र 50 हजार रुपये इतकी ई-वे बिल मर्यादा आहे. राज्यातील लहान व्यापाऱ्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय करणे सोपे जावे, अडचणीचे ठरू नये यादृष्टीने छोट्या व्यापाऱ्यांसाठी ई-वे बिलची राज्यांतर्गत मालवाहतूकीसाठीची मर्यादा 1 लाख रुपये इतकी ठेवण्यात आल्याने राज्यातील छोटे व्यापारी, उद्योग-व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही मूल्याच्या कापसाच्या लडी, सूत, कापड, कपडे यासारखा माल राज्यांतर्गत 50 कि.मी. पर्यंतच्या अंतरावर प्रक्रिया करण्यासाठी पाठवल्यास त्यास ही ई-वे बिलामधून वगळण्यात आले असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.