पाऊस पडून गेल्यावर धरणी चिंब भिजून जाते. पाणी पिऊनिया राने तृप्त झाली, हिरवा शालू नेसुनी वसुंधरा साज सजली. वसुंधरा नटूनथटून नववधूसारखी भासत आहे. हिरव्या पाचूच्या दागिन्यांनी ती मढली आहे. केसांत रंगीबेरंगी फुलांचा गजरा माळला आहे. असा सुखसोहळा श्रावणमासात साजरा होतो. श्रावण महिना म्हणजे निसर्गातील पवित्र ऋतू.
सणांची रेलचेल, पूजापाठ, उपवास, आरत्या, व्रतवैकल्ये असे वातावरण सर्वांना प्रसन्न ठेवते. “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमाली’चे असे श्रावणाचे वर्णन एका ज्येष्ठ कवींनी केले आहे. निसर्गातील सतेजपणा, पानांची कोवळीक, फुलांचे बहरणे, झऱ्यांची खळखळ अशा वातावरणात श्रावण आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून देतो. श्रावणात अनेक ऋषीमुनींनी साधना केली असावी, कित्येक पवित्र कार्य श्रावणात केली जात असावीत.
निसर्गाचे मनोहारी रूप न्याहाळावे ते श्रावणातच. डोंगरमाथ्यावर कृष्णवर्णीय मेघांची दाटी झालेली, पावसाचे वातावरण आणि कुठून लबाड वारा येतो आणि ढगांना दूरवर पिटाळत पुन्हा क्षितिजावर येतो. पुन्हा खेळ सुरू होतो ऊन-पावसाचा. क्षितिजावर सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मखर उभारून प्रकाशकिरणांची जादुगिरी सुरू असते. भूतलावर स्वर्ग पाहायचा असेल तर श्रावणात निसर्गाला गाठावे, त्याच्याशी चार गुजगोष्टी कराव्यात.
जीवनातील संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. शांत तळ्याकाठी हिरवी झाडी, क्षितिजावर निळ्या-जांभळ्या रंगांची दाटी, दरीत पडणारे धबधब्याचे दुधासारखे जल, पाण्याचा रोरावणारा आवाज, नदीतील पाण्याला आलेला वेग हे पाहण्यात मोठी मौज आहे. सृष्टीच्या या खेळातून सर्वांग प्रफुल्लित होते, अंगात नवीन, सकारात्मक विचारांचा प्रवाह वाहतो. जणू अंगी धबधबा कोसळत असतो, चैतन्य वाहत असते.
मन वेडे पावसात चिंब न्हाते, फुलांचे गंधाळणे मज धुंद करते. त्या शीतल वाऱ्याच्या लहरी अंगाअंगावर रोमांच निर्माण करतात आणि मी श्रावणातील झाडावर झोके घेतो श्रावणात मनही चिंब भिजले आहे. हे सखे, तू या जीवनाच्या प्रवाहात साथ दे, सुख-अमृताची बरसात कर, असे मन प्रियेला सांगण्यास आतुरले आहे. वाऱ्याच्या दूतासंगे प्रियेला हा निरोप.
ऋतूंचा राजा श्रावण तुझी वाट पाहात आहे. तलावांत डुंबत असलेले राजहंस, कमळेही फुलली आहेत, मंदिराशेजारील औदूंबर साधनेत मग्न, फुलांना घाई दत्तात्रेयांच्या पायाशी, पाखरांनी आराधना करण्यास सुरुवात केली आहे. माहेराला आलेल्या पोरी-बाळी सासर विसरून झिम्मा-फुगडी खेळत आहेत. त्यांच्यासाठी निसर्गाने एवढी आरास केली आहे. माळावर वारुळातील नागोबादादा लाह्यांची वाट पाहात आहे. श्रावण असा सजूनधजून आपल्या स्वागतासाठी तयार आहे.