अकोला : अकोल्यातील ‘ग्रीनलँड हॉटेल’चे सभागृह स्वात्रंत्र्य दिनाच्या दिवशी पार भारावून गेले होते. कारण काल याठिकाणी भावना, संवेदना, अभिमान अन् आपुलकीच्या भावनांनी ओथंबलेल्या एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांच्यासाठी हा हृद्य सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यांनी आपला मुलगा, पती, वडील या देशासाठी अर्पण केलेला. या अशा कुटुंबीयांची सेवा या कार्यक्रमात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करून आपली सद्भावना व्यक्त केली.
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या कुटूंबियांचा अनोखा सन्मान केला. बच्चू कडू यांनी वीरमातांचे पाय धुतले. चांदीच्या ताटात या कुटूंबियांना शाही भोजन दिले. या अनोख्या पंगतीत बच्चू कडू स्वत:च ‘वाढपी’ही झाले होते. त्याचे या कार्यक्रमातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
‘ग्रीनलँड हॉटेल’ सभागृहातले संपूर्ण वातावरणच भावूकतेने भरलेले होते. पाटावर सजवलेले चांदीचे ताट, ताटातले पंच-पक्वान्नं, आग्रहाने वाढणारे मंत्री अन जिल्हाधिकारी. अन कार्यक्रमानंतर आपुलकीने वीर माता-पित्यांना दिलेली शाल अन साडी-चोळी.
या अनोख्या सन्मानाने कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या कार्यक्रमात 28 शहीदांच्या कुटूंबियांना बोलावण्यात आले होते.