भवानीनगर- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्यावतीने शंभर पोती साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला तेथील नदीला पूराने जनजीवन विस्कळीत झाले, अनेक कुटुंब, संसार उध्वस्त झाला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कारखान्याचे कामगार व सभासदांच्यावतीने मदतीचा निर्णय घेण्यात आला. पूरग्रस्तांना मदत करणे हे राज्यातील जनतेचे आद्यकर्तव्य आहे. सामाजिक भावना जपून पूरग्रस्तांसाठी ही मदत करण्यात आली आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. तर कित्येक जनावरे यात मृत पडलेली आहेत तसेच कित्येक नागरीकांचे व कुटुंबाचे या पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे शक्य नाही, तरी देखील या पूरग्रस्त नागरिकांना यातून सावरण्यासाठी श्री छत्रपती कारखाना, सभासद व कामगार यांनी याकामी पुढे येण्याचा निर्णय घेतला आहे.