पुणे – डॉ. सलीम पक्षी अभयारण्यात टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यामुळे अभयारण्यातील झऱ्याची दुर्दशा झाली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झऱ्याचा प्रवाह खोळंबला आहे. त्यामुळे परिसरातील पक्ष्यांचा अधिवास हिरावत आहे. अभयारण्यात टाकण्यात येणारा राडारोडा तातडीने थांबविण्याचे आश्वासन देऊनही अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत सेव्ह सालीम अली बर्ड सेंच्युरी या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
अभयारण्यात शेकडो पक्ष्यांचा अधिवास असतो. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा अशा सर्वच ऋतुंमध्ये असंख्य पक्षी याठिकाणी वास्तव्यास येतात. प्रामुख्याने अभयारण्यातील झऱ्यालगत, पाणथळ प्रदेशात हे पक्षी राहतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा टाकला जातो. यासंदर्भात स्थानिक पर्यावरणप्रेमींना वारंवार तक्रार केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन परिसराची पाहणी केली होती. तसेच हा राडारोडा टाकणे थांबविण्याबाबत कारवाई करणार असल्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणाबाबत प्रशासन उदासीन
महापालिकेने नेहमीच येथील पर्यावरणाच्या प्रश्नाबाबत उदासीनता दाखवली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. येथील कचऱ्याची समस्या अद्याप सुटलेली नाही आणि आता बांधकामाचा राडारोडा देखील तसाच पडून आहे. प्रशासनाकडून पर्यावरणाबाबत दाखविली ही उदासीनता चिंतेची बाब असून याकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आणि पक्षी अभ्यासक धर्मराज पाटील यांनी सांगितले.