लंडन : जम्मू काश्मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. कारण भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्ताननंतर आता ब्रिटनच्या संसदेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनिक राब यांनी स्वत: या प्रकरणावरुन भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
जम्मू-काश्मीरच्या बाबतीत सरकारने घेतलेला निर्णय काही जणांना रुचत आहे तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, भारताच्या दृष्टीकोनातून ब्रिटनने या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली तसेच सध्याच्या परिस्थितीत शांतता राखण्यात यावी असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. भारत सरकारच्या निर्णयावरुन ब्रिटन संसदेत चर्चा करण्यात आली. त्यावेळी संसदेच्या काही सदस्यांनी भारताच्या निर्णयावरुन चिंता व्यक्त केली तर काही सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. काश्मीर मुद्द्यावरुन असणाऱ्या स्थितीवर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलून चिंता व्यक्त केली. भारताच्या स्थितीवर ब्रिटन लक्ष ठेऊन असल्याचं सांगितले.