नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर चीनने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. प्रदेशातील तणाव टाळण्यासाठी भारताने जम्मू-काश्मीरसंदर्भात एकतर्फी निर्णय घेणे टाळले पाहिजे तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यावरही चीनने आक्षेप घेतला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचे चीनने म्हटले आहे.
भारत सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून दोन भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चीनने आपली भूमिका मांडली. भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवरुन काही वाद आहेत. त्यात अक्साई चीनचा भाग हा लडाखमध्ये येतो. त्यामुळे चीनने लडाखला केंद्र शासित प्रदेश मान्य करण्यास नकार दिला आहे.