पाकिस्तानी लष्करप्रमुखांची दर्पोक्ती
इस्लामाबाद: भारताने जम्मू-काश्मीरबाबत धडक निर्णय घेतल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानकडून उसने अवसान आणले जात आहे. आता काश्मिरींना मदत करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी असल्याची दर्पोक्ती पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी केली आहे.
जम्मू-काश्मीरवर नेहमीच वाकडी नजर ठेऊन असणाऱ्या पाकिस्तानची अवस्था भारताने उचललेल्या पाऊलांमुळे केविलवाणी झाली आहे. त्यातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्या देशाच्या विविध उच्चपदस्थीयांकडून उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीला शोभेशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यात बाजवा हेही मागे राहिलेले नाहीत. काश्मिरींच्या न्याय्य लढ्याला पाकिस्तानी लष्कराचा ठामपणे पाठिंबा आहे.
कर्तव्य पालनासाठी काहीही करण्याची तयारी पाकिस्तानी लष्कराने ठेवली आहे, असे ते म्हणाले. ते पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. काश्मीरसंदर्भात भारताच्या कृती पाकिस्तान सरकारने अमान्य केल्या. पाकिस्तान सरकारच्या भूमिकेला त्या बैठकीत पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला. केवळ काश्मीरबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराची बैठक झाली. त्यातूून पाकिस्तानची अस्वस्थता वाढीस लागल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले.