तालुक्यावर पावसाची कृपा; शेतकरी सुखावला
वेल्हे- निसर्ग संपन्नतेने नटलेल्या वेल्हे तालुक्यात पारंपरिक व अधुनिक पद्धतीने भात लागवड करण्यात आली असून काही अपवाद वगळता संपूर्ण तालुक्यात भात व नाचणी लागवड पूर्ण झाली आहे. सुरवातीला लांबलेल्या पावसामूळे भात पेरणी ते लागवड उशीरा झाली असली तरी, त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे. गावोगावी मोठ्या प्रमाणात भात लावणीस सुरवात होऊन ती पूर्ण झाली आहे. तर विसावलेल्या पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
वेल्हे तालुक्यात भाताचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. इथे आंबेमोहर, इंद्रायणी, रत्नागिरी, 157, हाळवे बारीक, एंडम, सोनम, पूनम, वरंगाळ, इत्यादी जातीच्या तांदुळाबरोबरच नाचणी व वरईचे पीक घेतले जाते. राज्यातील विविध भागातून येथील तांदळाला मागणी असते अनेकजण लावणी काळातच शेतकऱ्यांशी संपर्क करून आगाऊ बुकिंग करतात.
अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या वेल्हे तालुक्यात. शेती ही सर्वस्वी पारंपरिक पद्धतीने बैल व डोंगरी भागात रेडा या जनावरांवर अवलंबून असे. पण, बदलत्या काळानुसार शेतकरीवर्गाने तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली आहे. पेरणी, चिखलनी, रोपवाटिका, लावणी, मळणी यासाठी यंत्राचा वापर करण्यात येऊ लागला आहे. जपानी व श्री पद्धतीने भात लावणी करण्यात येते, यासाठी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे व शासनाच्या कृषी विभागाची मोलाची मदत झाली. कालांतराने याचा फायदा दिसू लागला. उत्पादन क्षमता वाढतानाच अतिरिक्त श्रम वाचले. ज्यामुळे मुक्या प्राण्यावर असणारे ओझे कमी झाले. शेतीची कामे कमी वेळेत होऊ लागली, उत्पन्नात दुपटीने वाढ झाली. हे बदल लक्षात येताच शेतकरी वर्गाने शेतीत पारंपरिक व आधुनिक पद्धतीचा वापर करण्यास सुरवात केली आहे.
जिथे तंत्रज्ञानाची गरज आहे तिथे तंत्रज्ञान व जिथे पारंपरिक पद्धतीची गरज आहे तिथे ती पद्धत वापरली जात आहे. दोन्ही गोष्टींची सांगड घालून शेतीची कामे केल्यास ती अधिक चांगल्या पद्धतीने होतात. याची जाणीव शेतकऱ्यांना झाली असून याचे चित्र वेल्हे तालुक्यात पाहायला मिळत आहे.