उत्पादन वाढीसाठी मात्र मोठ्या पावसाची गरज
कुरकुंभ- दौंड तालुक्यात गेल्या एक-दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यातील काही भागांत या आठवड्यात रिमझिम स्वरूपात हजेरी लावल्याने खरीप पिकांना काही अंशी संजीवनी मिळाली. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला या पावसाने दिलासा मिळाला असला तरी अजूनही मोठ्या पावसासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.
दौंड तालुक्यातील काही भागांत शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली होती. मागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, सध्या झालेल्या रिमझिम पावसाने ही चिंता काहीअंशी मिटविली आहे. अल्प पावसामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी, जिरेगाव या भागात बाजरीऱ्या पेरण्या अत्यंत कमी प्रमाणात झाल्या आहेत. रिमझिम पावसामुळे पिके डोलू लागले असली तरी मोठ्या पावसासाठी प्रतीक्षाच आहे. दौंड तालुक्याला पावसाच्या लहरीचा फटका शेतकऱ्यांसोबत सामान्य नागरिकांनाही बसला आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी दमदार पाऊस न झाल्याने या भागातील काही विहिरी, कूपनलिकाही कोरड्याच आहेत.
- रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी अजूनही कुरकुंभ, पांढरेवाडी, जिरेगाव भागांत दमदार पाऊस न झाल्याने या भागांतील काही विहिरी कोरड्याच आहेत. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल.
– राहुल शितोळे, प्रगतशील शेतकरी, कुरकुंभ