गिरीश बापट : ग्राहक संरक्षण विधेयक 2019चे केले स्वागत
पुणे – ग्राहकांना आपल्या हक्क आणि अधिकारासंदर्भात विद्यार्थी दशेपासून शिक्षण दिले पाहिजे. यामुळे ग्राहकांमध्ये जनजागृती होऊन त्यांची होणारी फसवणूक टळेल. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन हे विधेयक तयार केले आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर त्यांना नुकसानभरपाई देण्याचे तसेच फसवणूक करणाऱ्याला दंड आणि शिक्षा करण्याच्या तरतूदी या विधेयकामध्ये आहेत. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून या विधेयकामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे विक्रेत्यावर आणि व्यापाऱ्यांवर मोठा वचक बसणार आहे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
ग्राहक संरक्षण विधेयक 2019 चे स्वागत करताना संसदेमध्ये बापट बोलत होते. या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना खासदार बापट म्हणाले, 1986 पासून आजपर्यंत हे विधेयक कार्यात होते. आजवर या विधेयकामध्ये अनेकवेळा दुरुस्त्या झाल्या, मात्र आज सादर झालेल्या विधेयकांमध्ये ग्राहकाला सर्वोच्चस्थानी ठेऊन विचार केलाय. ग्राहक हा उपभोक्ता असतो, लाभार्थीं असतो, तो त्या वस्तूंचा वापर करतो, म्हणून सर्वाधिक त्रास त्याला होत असतो. त्याची काळजी या विधेयकामध्ये घेतली आहे म्हणून हे विधेयक वैशिष्ट्यपूर्ण आहे.
जिल्हा, राज्य आणि केंद्रस्तरावर वेगवेगळे विभाग करून त्या-त्या विभागातील लोकांना न्याय देण्याकरिता या विधेयकामध्ये असणाऱ्या तरतुदींचा भविष्यात उपयोग होणार आहे. कायदा निर्माण होण्याआधी त्याच्या पळवाटा तयार होतात. या पळवाटा टाळण्यासाठी कायदा भक्कम केला पाहिजे. याच्या प्रभावीपणाने अंमलबजावणीसाठी नवीनवीन माध्यमांचा उपयोग करून घेतला पाहिजे, असेही बापट यांनी सांगितले.