नवी दिल्ली – केंद्र सरकारने या वर्षी निर्गुंतवणुकीद्वारा 1 लाख 5 हजार कोटी रुपये उभे करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी किमान दहा सरकारी कंपन्या शेअर बाजारावर नोंदल्या जाणार आहेत.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव अतनु चक्रवर्ती यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात बराच प्रयत्न करूनही कंपन्यांचे खाजगीकरण करता आलेले नाही. मात्र आता गुंतवणुकीसाठी आणि खाजगीकरणासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी दहा कंपन्यांची शेअर बाजारावर नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदणी होणाऱ्या एकूण सरकारी कंपन्यांची एकूण संख्या 60 होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर याच वर्षात आणखी 3 ते 4 सरकारी कंपन्यांची शेअर बाजारावर नोंदणी करण्याच्या शक्यतेवर विचार चालू असल्याचे ते म्हणाले. यावर्षी ठरल्याप्रमाणे केंद्र सरकार निर्गुंतवणुकीद्वारा 1 लाख 5 हजार कोटी रुपये उभा करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारण गेल्या वर्षी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 80 हजार कोटी रुपये उभे करण्यात यश मिळाले होते.