सभापती रामराजे निंबाळकरांनी दिले चौकशीचे आदेश
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी 24 जूनला दिली आहे. या प्रकरणी आज सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदेत लाचलुचपत विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. राज्यात जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार एकूण 1300 प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत पुन्हा उपस्थीत करण्यात आला. गेल्या आठवड्यात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता.राज्यभरातील सुमारे 1300 जलयुक्त शिवारची कामे झाली असून जिथे गैरव्यवहार झाला आहे. अशा ठिकाणी जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावरच या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही हा निर्णय घेऊ असे जलंसधारण मंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
याबाबत आज प्रश्न उपस्थित होताच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा तिच उत्तरे द्यायला सुरुवात केली. तेव्हा विरोधकांनी यावर आक्षेप घेताच सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्वत: यामध्ये हस्तक्षेप करत लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले.