चाकण- गेली दोन दिवस होत असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर रविवारी (दि. 9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तब्बल एक ते दीड तास चाकण परिसराला वळवाच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. चारच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केली, सोबत सोसाट्याचा वारा, वीज यासह वरुणराजाने जोरदार आगमन केले.
या पावसामुळे परिसरातील नागरिकांची मोठी धांदल उडाली. पुणे-नाशिक महामार्गावर या पावसाने नेहमीप्रमाणे पाण्याचे तळे साचून पाणीच पाणी झाले होते. चाकण व परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, आंबेठाण, काळूस, बहुळ, मेदनकरवाडी, कडाचीवाडी या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. परिसरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटसह पाऊस पडला. दिवसभरच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी या पावसामुळे हवेतील गारव्याने समाधान व्यक्त केले.