बैठकांना उपस्थित रहा, अन्यथा शिस्तभंग
स्थायी समितीलाच महत्त्व…
एका बाजूला महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून शहर सुधारणा समितीसह विशेष समित्यांना वारंवार दांडी मारली जात असली, तरी दुसऱ्या बाजूला मात्र स्थायी समित्यांच्या बैठकांना झाडून हजेरी लावली जात आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीच कायद्याने स्थापना करण्यात आलेल्या विशेष समित्यांना दुय्यम महत्त्व देत असल्याची चर्चा महापालिकेत आहे. या समित्यांमध्ये मान्य होणारे निर्णय पुन्हा स्थायी समिती आणि मुख्यसभेत मान्यतेसाठी जातात. असे असतानाही, प्रशासन या समित्यांकडे दुर्लक्ष करत आहेत.
पुणे – महापालिकेच्या शहर सुधारणा समितीत वारंवार सूचना देऊनही अनुपस्थितीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांना “यापुढे पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी आदेशच आयुक्तांनी नुकतेच काढले आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा बैठका सुरू झाल्या आहेत. दि.30 मे रोजीही शहर सुधारणा समितीची बैठक होती. मात्र, अधिकारी उपस्थित नसल्याने बैठक तहकूब करावी लागली. तर सर्व समिती सदस्य नवीन असल्याने त्यांना कामकाजाची माहिती हवी होती. मात्र, अधिकारीच नसल्याने या सदस्यांनी तसेच समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी याबाबत आयुक्त सौरभ राव यांच्याकडे थेट तक्रार केली. याची गंभीर दखल घेत सौरभ राव यांनीही लेखी आदेश काढले असून जे अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.