लखनौ: उत्तरप्रदेशात वादळाच्या तडाख्यात आणि विज कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण 26 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. यातील सहा जण मैनपुरी जिल्ह्यात दगावले आहेत. इटाह आणि कासगंज येथील वादळाशी संबंधीत घटनांमध्ये प्रत्येकी तीन जण ठार झाले असून मोरादाबाद येथे वीज अंगावर पडून एक जण दगावला. तसेच विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये सुमारे 57 नागरीक जखमी झाले आहेत.
गुरूवारी रात्री उत्तरप्रदेशच्या बऱ्याच भागाला धुळीच्या वादळाचा जोरदार तडाखा बसला. या वादळात मैनुपरी जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती कोसळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पडझडीच्या घटनांमध्ये सुमारे 41 जण जखमी झाले असून त्यांना योग्य ते उपचार दिले जात आहेत, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच बदायू, पीलीभीत, मथुरा, कन्नौज, संभल आणि गाझियाबाद येथे प्रत्येकी एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे वादळी पावसात झालेल्या आर्थिक नुकसानीची पाहणी लवकरच घेतली जाणार आहे. त्यानंतर संबंधीतांना मदत देण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रभावीत झालेल्या एटा, कासगंज, मैनपुरी, बदायू, मोरादाबाद, फर्रुखाबाद आदी क्षेत्रातील प्रभारी मंत्र्यांना तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिका-यांना स्वतः बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.