एक लाख ग्राहकांशी चर्चा करून अडचणी समजून घेणार
मुंबई – स्टेट बॅंक ऑफ इंडिया राष्ट्रीय पातळीवर ग्राहक संपर्क अभियान राबविणार आहे. 28 मे रोजी बॅंकेच्या देशभरातील कार्यालयात वरिष्ठ अधिकारी ग्राहकाशी संपर्क साधून मेळावे घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतील.
बॅंक त्या आधारावर आपली सेवा कार्यक्षम बनविण्याचा प्रयत्न करणार आहे. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक पी के गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात पाचशे ठिकाणी 1 लाख ग्राहकांशी संपर्क साधण्याचा बॅंकेचा प्रयत्न असणार आहे. बॅंकेच्या कामकाजात कोणत्या सुधारणा करण्याची गरज आहे याची माहिती ग्राहकाकडून घेतली जाईल. आणि त्या आधारावर निर्णय घेतले जातील.त्याचबरोबर बॅंकेने गेल्या काही महिन्यापासून बऱ्याच नव्या सेवा सुरू केलेल्या आहेत. त्या सेवाचा कसा उपयोग करून घ्यायचा याची माहिती ग्राहकांना दिली जाईल.
या मेळाव्याला बॅंकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॅंकेच्या सेवा आणि उत्पादनात कोणते बदल करता येतील याचा अंदाज ग्राहकाशी केलेल्या चर्चेनंतर घेता येऊ शकेल. काही तिमाहीपासून कर्जाचा उठाव कमी झालेला आहे. त्याचबरोबर बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता वाढली आहे. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्राचे आरोग्य कमकुवत झालेले आहे.
आता रिझर्व्ह बॅंक आणि सरकार बॅंकांना शक्य तितक्या लवकर कार्यक्षम बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेतला असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. बॅंकेने आपल्या कर्जाचे व्याजदर रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर जोडलेल्या आहेत. त्यामुळे रेपोदरात बदल झाल्यानंतर बॅंकेच्या कर्ज आणि ठेवीवरील व्याज दरात लवकर बदल होतील.