नवी दिल्ली – महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळलेला शेतकरी आणि हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल चालत जाणाऱ्या महिलांना आता मान्सूनचाच आधार आहे. त्यामुळे प्रत्येकाला मान्सून कधी येणार याची प्रतिक्षा आहे. त्यातच मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं स्कायमेटचे शास्त्रज्ञ सुशांत पुराणिक यांनी सांगितल आहे.
तसेच देशभरात यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस कोसळणार असल्याचंही स्कायमेटनं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल अशी शक्यताही स्कायमेटने वर्तवली आहे.