पुणे – शहरात साखळी चोरीचा धुमाकुळ घालणाऱ्या टोळीतील पाच जणांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. त्यांच्याकडून मिळून आलेले मोठ्या प्रमाणातील सोने शिक्षा सुनावण्यासाठी महत्त्वपूर्ण पुरावा ठरले.
सज्जाद गरीबशा पठाण ऊर्फ इराणी (वय 30), मुस्तफा फते इराणी (वय 30), शब्बीर मिस्किन शेख ऊर्फ इराणी (वय 24), अलिम शकील पठाण (वय 21, चौघेही, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि सलीम अब्दुल शेख (वय 32, रा. भुसावळ, जि. जळगांव) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भवानी पेठ येथे राहणाऱ्या 54 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 30 मार्च 2014 रोजी सकाळी 6.45 च्या सुमारास भवानी पेठ येथील नेहरू रस्त्यावर घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतितिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले.
त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादींनी त्यांची चोरलेली सोन्याची चेन ओळखल्याचा पुरावा महत्त्वाचा ठरला. फिर्यादी पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकी, स्वीफ्टमधून आलेल्यांनी त्यांच्या गळ्यतील 30 हजार रुपये किंमतीच्या सोन्याची जबरी चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सर्वजण सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्यावर शहरात साखळी चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. कावेडीया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 395 (दरोडा) नुसार शिक्षा सुनावली.