हैदराबाद: आयपीएलच्या १२ व्या सत्रातील अंतिम सामन्यामध्ये आज मुंबईने राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर चेन्नईला शेवटच्या चेंडूवर नमवित आयपीलच्या चषकावर आपले नाव कोरले. मुंबईच्या संघाने केलेल्या धमाकेदार सुरूवातीनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे मुंबई इंडियन्सच्या संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४९ धावांचीच मजल मारता आली होती. मुम्बईच्या या तुटपुंज्या आव्हानाचा धोनी बिग्रेड सहज पाठलाग करेल असं वाटलं होत मात्र डू प्लेसिस (२६ धावा), सुरेश रैना (८ धावा) अंबाती रायुडू (१ धाव) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (२ धावा) या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्याने चेन्नईच्या पदरात शेवट पराभव पडला.
हैदराबादच्या पाटा खेळपट्टीवर मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली. मुंबईला कायम दमदार सुरुवात करुन देणाऱ्या क्विंटन डिकॉकने आजही आक्रमक सुरुवात केली. त्याला रोहित एकेरी आणि दुहेरी धावा काढत चांगली साथ देत होता. या दोघांनी ४ षटकांत जवळपास ४० धावा केल्या होत्या त्यामुळे मुंबईचे सलामीवीर मोठी धावसंख्या उभा करणार असे वाटत असतानाच चेन्नईने सामन्यात पुनरागमन केले. शार्दुल ठाकूरने चार षटकार ठोकून १७ चेंडूत २९ धावा करणाऱ्या डिकॉकला बाद करत मुंबईला ४५ धावांवर पहिला धक्का दिला. तर, पाठोपाठ दिपक चहरने कर्णधार रोहित शर्माला १५ धावांवर बाद करत ४५ धावांवर असतानाच मुंबईला दुसरा धक्का दिला.
मुंबईला बसलेल्या या दोन मोठ्या धक्यांमुळे त्यांच्या धावगतीला जोरदार ब्रेक लागला. 5 षटकांमध्ये 45 धावा करणारी मुंबई ७ षटकापर्यंत फक्त ५३ धावांपर्यंत पोहचली होती. यावेळी खालावलेली धावगती वाढवण्याच्या नादात सुर्यकुमार यादव हा १५ धावा करुन परतल्याने मुंबईच्या संघाचा पाय आणखीन खोलात गेला. यावेळी मुंबईची ११.३ षटकांत ३ बाद ८२ अशी अवस्था झाली होती. तर यानंतर आलेला कृणाल पांड्या हादेखील लागलीच परतल्याने मुंबईची ४ बाद ८९ अशी अवस्था झाली. यावेळी धदाकेबाज सुरूवात करणारी मुंबईची अवस्था इतकी बिकट होईल याची जानीव कोणालाच नसताना यानंतर दुसऱ्या बाजुने फटकेबाजीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या इशान किशनने मुंबईला शंभर धावांची मजल ओलांडून दिली. मात्र, तो देखील लागलीच २६ चेंडूत २३ धावाच करु शकल्याने मुंबईचा संघ मोठ्या अडचणीत सापडला.
यावेळी किशन बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला साथीत घेत पोलार्डने संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. त्यामुळे अडचनीत आलेला मुंबईचा संघाने आश्वासक वाटचाल सुरू केली असतानाच हार्दिक पांड्या १० चेंडूत १६ धावांची आक्रमक खेळी करुन परतला. तर लागलीच राहुल चहार देखील परतल्याने मुंबईच्या धावगतीला ब्रेक लागला. अखेर पोलार्डने फटकेबाजी करत मुंबई १४९ धावांची मजल मारुन दिली. यावेळी चेन्नईकडून दिपक चहारने तीन तर शार्दुल ठाकुर आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.