विनंती बदली अर्जांना केराची टोपली : सात वर्षांपासून मागण्या अडगळीत, प्रशासन दखल घेईना
पुणे – पती- पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने या दोघानांही एकाच ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, असा शासन नियम आहे. पण, महावितरण प्रशासनाने हा नियमच पायदळी तुडवला आहे. कंपनीत काम करणाऱ्या पती-पत्नींनी गेल्या पाच ते सात वर्षांपासून विनंती बदलीचा अर्ज करुनही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे विभक्त राहण्याची वेळ या पती-पत्नींवर आली आहे. त्याचा फटका तब्बल 1,200 जोडप्यांना बसला आहे.
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांनी स्वत:चे बदलीचे धोरण ठरविले आहे. त्यामुळे एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दुसऱ्या कंपनीत बदली मागता येत नाही. मात्र, एखाद्या कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पती दुसऱ्या कंपनीत नोकरी करत असल्यास दोघांनाही ही कंपनी बदलून घेण्याचे अधिकार कायद्यानुसार देण्यात आले आहेत. त्याशिवाय दोघेही एकाच कंपनीत नोकरी करत असल्यास एकाच परिमंडलात त्यांना बदली मागण्यात येते, त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार तीनही कंपन्यांनी हे नियम तयार केले आहेत.
मात्र, गेल्या दहा वर्षांत महावितरणसह अन्य कंपन्यांच्या प्रशासनांनी या नियमालाच हरताळ फासला आहे. राज्यभरातील महावितरणच्या तब्बल बाराशे जोडप्यांनी एकत्रिकरणासाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी या पती-पत्नीच्या वतीने मुख्य कार्यालय ते राज्य शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. पण, यासंदर्भात अद्याप सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.
कर्मचारी असलेल्या जोडप्यांना विभक्त राहावे लागत आहे. यासंदर्भात अनेकांनी संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या भावना प्रशासनाकडे पोहचविल्या आहेत. मात्र, ढिसाळ कारभारामुळे हा निर्णय अद्याप होऊ झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट इलक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणिस कृष्णा भोयर यांनी “प्रभात’ शी बोलताना दिला.