सातारा – सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने आज मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी औद्योगिक विस्ताराला संधी असतानाही पूर्वीच्या लाेकप्रतिनिधींना उद्योगधंदे आणता आले नाहीत. औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी कामगाराची, उद्योगधंद्यांची जाण असणाऱ्या आ. शशिकांत शिंदे यांना लाेकसभेत जाण्याची संधी द्या, असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांच्या सुविध्य पत्नी सौ. वैशाली शिंदे यांनी केले.
सातारा लाेकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सातारा औद्योगिक वसाहत व परिसरात मतदार व कामगारांशी संवाद साधताना सौ. वैशाली शिंदे बोलत होत्या. यावेळी सौ. समिंद्रा जाधव, जिल्हाध्यक्षा सौ. संजना जगदाळे, तेजस्विनी केसरकर, प्रज्ञा गायकवाड, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.
सौ. शिंदे यांनी यावेळी औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांना भेट दिली. यादरम्यान कंपनी व्यवस्थापन व कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. सध्या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगाराची समस्या आहे. सातारा औद्योगिक वसाहतीसह अन्य ठिकाणी कंपन्या येणे अपेक्षित होते मात्र लाेकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कंपन्या आल्या नाहीत, असा आरोप सौ. शिंदे यांनी केला.
सौ. समिंद्रा जाधव म्हणाल्या, शशिकांत शिंदे यांना मतदारांनी संधी दिल्यास महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते जिल्ह्याचा निश्चित कायापालट करतील अशी अपेक्षा असल्यानेच मतदारसंघात त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. सातारच्या नव्या आणि जुन्या औद्योगिक वसाहतीत कंपन्यांचे, कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर शशिकांत शिंदे यांना मतदारांनी संधी देवून लाेकसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कंपनी व्यवस्थापन व कामगारांच्या वतीने सौ. वैशाली शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य – सौ. शिंदे
सातारा येथील नव्या व जुन्या औद्योगिक वसहतींमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्याबरोबर नवीन उद्योग, व्यवसाय साताऱ्यात आणण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. याठिकाणची एकही कंपनी न हलता नवनवीन उद्योग आणून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येइल. गेल्या कित्येक वर्षात युवकांना फक्त आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. युवकांचा केवळ वापर करुन घेण्यात येत असून आता युवकांनी सावध होण्याची गरज आहे. आज ८४ वर्षाचा यौध्दा असलेले शरद पवार राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. या सभांमध्ये ज्येष्ठ नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून जिल्ह्यातील युवा वर्ग आ. शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास सौ. वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला.