मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गेल्या आठवड्यापासून विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहेत. मात्र ही तेजी बर्याच विश्लेषकांना संदीग्ध वाटत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विशेषत: किरकोळ गुंतवणूकदारानी अतिशय सावध राहून व्यवहार करण्याची गरज असल्याचे विश्लेषकांनी सुचित केले आहे.
त्यातच मार्च महिन्यामध्ये अमेरिकेतील महागाई कमी होण्याऐवजी वाढून 3.5% वर गेली आहे. याचा नकारात्मक परिणाम लगेच अमेरिकेतील शेअर बाजारावर झाला आणि शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचबरोबर अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत असतानाच अमेरिकेतील दोन आणि पाच वर्षाच्या कर्जरोख्यावरील परतावा त्याच वेगाने वाढला आहे. अशा प्रकारचा परिणाम भारतासह इतर देशातील शेअर बाजारावरही होण्याची शक्यता काही गुंतवणूकदारांनी सूचित केली.
जानेवारीपासून शेअर बाजाराचे निर्देशांक 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर किंवा ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर लगेच हे निर्देशांक परत फिरल्याचे दिसून येत आहे. बाजारातील परिस्थिती खर्या अर्थाने बळकट आहे असे यातून दिसून येत नाही.
एकीकडे डॉलर कमकुवत होत नसताना जागतिक पातळीवर वस्तूंचे दर मात्र वाढत आहेत. याचा अर्थ जागतिक शेअर बाजारात काहीतरी अयोग्य घडत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आशावादी असले तरी हरकत नाही परंतु तेवढ्याच प्रमाणात सावधही राहणे गरजेचे आहे असे कॅशदिचोज इंडेक्स ट्रेड या संस्थेचे टेक्निशियन जय बाला यांनी सांगितले.
शेअर बाजार निर्देशांक वाढत आहेत. मात्र या तेजीचा स्त्रोत काय आहे हे संदीग्ध वाटत आहे. भारतीय बाजार तेजीसाठी पूरक आहे हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र इतक्या वेगात निर्देशांक वाढणे अपेक्षित नाही असे बर्याच गुंतवणूकदारांनी आणि विश्लेषकांनी सांगितले. दरम्यान लवकरच भारतातील कंपन्यांचे चौथ्या तिमाहिचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्यामधून भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती स्पष्ट होण्यास मदत मिळणार असल्याचे दिसून येते.