Raj Thackeray – मागील अठरा वर्षांत मी अनेक चढ-उतार पाहिले. या उतारात माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिले. एक दिवस पक्षाला यश मिळलेच आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना यश मिळवून देणारच, असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. यश मिळविण्यासाठी संयम ठेवा.
मला माझ्या कडेवरती माझी मुले खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुले कडेवर घेऊन फिरविण्यात आनंद मिळवला जात आहे. तसले सुख मला नको. माझ्यात ताकद आहे, असे सांगून राज ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.
नाशिकमध्ये पक्षाच्या 18 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले, पक्ष उभा करणे आणि चालवणे याला हिंमत लागते. आमच्या दहा वर्षे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. पण तो पक्ष नव्हता तर जिंकून येणाऱ्या आमदारांची मोळी होती.
महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर तो पहिला जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष आहेत. मनसे पक्षात असलेले ९० टक्के कार्यकर्ते कोणत्याही पक्षात नव्हते. सामान्य लोकांना घेऊन आम्ही पक्ष उभा केला, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
अरबी समुद्रात शिवस्मारक का नाही झाले? पंतप्रधान आले फुले वाहून गेले. त्या फुलांचे काय झाले, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी थेट मोदींवरही टीका केली. दुसरीकडे राज्यात ज्या प्रकारचे राजकारण सध्या चालू आहे.. कोण कुठे आहे हेच कळत नाही.
मात्र, माझे अजूनही ठाम मत आहे की सर्वजण आतून एकच आहे. फक्त तुम्हाला येडे बनवत आहेत. मूर्ख बनवत आहेत. यांचे आपापसांत राजकारण चालू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.