नवी दिल्ली – भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीने दिलेल्या वेळेत निवडणूक न घेतल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील महिन्यात भारतात होत असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन संकटात सापडले आहे. ही स्पर्धा येत्या ६ ते १५ मार्चदरम्यान कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर होणार असे अपेक्षित आहे.
या स्पर्धेचे प्रथमच भारताता आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून पॅरिस ऑलिम्पिकसाठी २४ कोटा निश्चित होणार आहेत. या स्पर्धेत ५२ देशातील ५०० हून अधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. भारताचे आघाडीचे नेमबाजही या स्पर्धेतून ऑलिम्पिक प्रवेशासाठी उत्सुक आहेत.
या स्पर्धेसाठी समितीने प्रवेशिकांची छाननी, खेळाडूंच्या व्हिसा मान्यता, राहण्याची सुविधा या सगळय़ा गोष्टी करण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच केंद्र सरकारने घेतलेल्या बरखास्तीच्या निर्णयामुळे या स्पर्धेचे संयोजन संकटात आले आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समितीने अंतर्गत निवडणूका घेण्यास असमर्थ ठरल्याने क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली. ऑलिम्पिकपटू दीपा मलिक यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीची मुदत ३१ जानेवारीला संपली आहे. मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, समितीने २८ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा केली आहे.
पॅरा नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेमुळे निवडणुकीला लांबणीवर टाकल्याचे क्रीडा मंत्रालयाला कळवले होते. मात्र, तरीही समिती बरखास्तीचा निर्णय घेतला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या स्पर्धेसाठी १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील पाच कोटी रुपये प्रायोजकांकडून उभे राहतील मात्र, सरकारच्या निर्णयामुळे सगळय़ाच अडचणी निर्माण झाल्या आहेत. बरखास्तीचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने एकदा तरी सूचित करायला हवे होते, पण त्यापैकी काहीच घडलेले नाही. आता इतक्या अल्पावधीत ही स्पर्धा दुसरे कुणी आयोजित करू शकेल असे वाटत नाही, असे समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे.