ajit pawar : राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता यावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी आता लवकरच काही आमदारांची घर वापसी होणार असल्याचे दावा केला आहे.
पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे. त्यांनी सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना काही आमदार निधीसाठी अजित पवार यांच्यासोबत गेले. पण आता मात्र लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अशात अजित पवारांकडे सध्या महाराष्ट्रातले ४१ आमदार तर शरद पवारांकडे १५ आमदार आहेत. यातील पाच आमदारांनी अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रं दिली आहेत. तर एका खासदारानेही दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं आहे.
दरम्यान हे पाच आमदार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पाच आमदारांनी आणि एका खासदाराने जर अजित पवारांसह जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांसाठी तो झटका असणार आहे. दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र देणारे हे पाच आमदार आणि खासदार कोण हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र विविध नावांची चर्चा आता सुरु झाली आहे.
अजित पवारांकडे अंदाजे महाराष्ट्र- ४१ आमदार तर नागालँड-७ आमदार , झारखंड-१ आमदार , महाराष्ट्र विधान परिषद- ५ आमदार आणि राज्यसभा १ खासदार आहे तर शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्र -१५ आमदार , केरळ -१ आमदार महाराष्ट्र विधान परिषद -४ आमदार, लोकसभा खासदार-४ आणि राज्यसभा ३ अशी संख्या बळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पाच आमदार आणि एक खासदार काय भूमिका घेणार हे याकडे सर्वांचे लक्ष आहे.