Chhagan Bhujbal : भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. ही घटना उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यातच घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी शरद पवार गटच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. “दोन लोक एकमेकांशी भांडतात, गोळीबार करतात, त्यांचे वैयक्तिक भांडण असते, त्यात देवेंद्र फडणवीस काय करू शकतात?”, असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
छगन भुजबळ यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी,“मी काल टीव्हीवर ही बातमी पाहिली, तेव्हाच मला आश्चर्य वाटलं. हे कशामुळं झालं, त्यांच्यामध्ये एवढा संताप का होता? याची माहिती समोर आलेली नाही. जे जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मी आताच या प्रकरणावर अधिक काही बोलणार नाही, कारण सत्यपरिस्थिती पाहावी लागेल. नाहीतर आंतरवाली सराटी सारखे होईल.
आंतरवाली सराटीमध्ये असेच झाले होते. आधी तिथे दगडफेक झाली, ८० जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण सर्वांसमोर पहिला भाग आलाच नाही, दुसरा भागच आला. त्यामुळे उल्हासनगरच्या प्रकरणात नेमकं काय घडलं, हे पाहावं लागेल. प्रत्यक्षदर्शी लोक याबाबत अधिक माहिती देऊ शकतील.”असे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याविषयी बोलताना भुजबळ यांनी सुप्रिया सुळेंवरच पलटवार करत “फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. फडणवीस यांनी गोळीबार करण्यासाठी सांगितलेले नाही. उल्हासनगर प्रकरणात दोन लोकांचे वैयक्तिक भांडण होते, असे दिसत आहे. वैयक्तिक भांडणातून असे गुन्हे घडत असतात. मलाही एक आमदार किती शिव्या घालतो, घाणघाण बोलतो, मारायची-कापायची भाषा वापरतो. त्याला फडणवीस काय करणार? फडणवीस एवढेच करू शकतात की, काही झाल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करू शकतात”, अशी उपरोधिक टीका छगन भुजबळ यांनी केली.