Yashomati Thakur : उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणाने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यातच आता काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्यात की, “सगळा गुंडाराज सुरू आहे, महाराष्ट्राचा बिहार करण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व केल जात आहे. एकीकडे मुंबईच्या सर्व गोष्टी तुम्ही गुजरातकडे नेत असून, दुसरीकडे अशा गोष्टींना तुम्ही वाव देत आहे. या लोकांवर गुन्हे दाखल होत नाही आणि त्यांना अटक देखील केली जात नाही. महाराष्ट्रामध्ये असे कधीच झाले नाही जे आज घडलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “या सर्व गोष्टींचा निषेध आहे. दुःख याचं आहे की, यांनी जी खिचडी महाराष्ट्रामध्ये चालवली आहे, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी अनबन सुरू आहे, त्याचा हे कारण आहे. गृहमंत्री तसे पटकन येतात प्रतिक्रिया देण्यासाठी, पण आज ते दिसत नाही. मुळात अशा गोष्टी सहन कशा केल्या जातात. महाराष्ट्राचा तुम्ही जर बिहार कराल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही.”
धक्कादायक म्हणजे, हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर ठाणे जिल्हा हादरला आहे. उल्हासनगरसह कल्याणमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहे. मिळलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांचं निवासी परिसरात तसेच कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.