Nitish Kumar Attack on Rahul Gandhi : एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये आले आहेत. आज सकाळी अचानक नितीशकुमार यांनी पोलिस मुख्यालयाला भेट देत पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कारण नितीश कुमार हे सुशासन सरकारसाठी ओळखले जातात. परंतु, या अगोदर महाआघाडी सरकारच्या काळात भाजपकडून सातत्याने राज्यातील गुन्हेगारीवर हल्ला चढवला जात होता. अशा परिस्थितीत बिहारमधील गुन्हेगारी नियंत्रणाबाबत पावले उचलण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या एका दाव्याने चांगलेच संतापले असल्याचे पाहायला मिळाले.
पोलिस मुख्यालयाला भेट देऊन बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी यांनी जात जनगणना आपल्या सांगण्यावरून केल्याच्या दाव्यावर बोलताना नितीश कुमार म्हणाले यापेक्षा फालतू काही आहे का? जात जनगणना कधी सुरू झाली? आम्ही 9 पक्षांना आमंत्रित केले होते. 2019 आणि 2020 मध्ये आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदेत सर्वत्र हेच म्हणायचो. 2021 मध्ये पंतप्रधानांना भेटायलाही गेलो होतो. मी त्यांनाही सांगितले तेव्हा त्यांनी आत्ता काही करणार नसल्याचे सांगितले. कुणीही खोटं बोलून स्वतःचं श्रेय घेत राहतं, असे म्हणत राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.
राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत बिहारमध्ये पोहोचले होते. राहुल गांधी यांनी येथे दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, “आम्ही आणि आरजेडीने नितीशकुमार यांच्यावर दबाव टाकून आम्ही जातीनिहाय सर्वेक्षण करून घेतले. ” असा दावा त्यांनी केला होता. त्यावरच आता नितीशकुमार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, काय होत आहे ते तुम्हाला माहीत आहे. याबाबत तपास सुरू आहे. जी काही बातमी येते ती आपण पाहतो. याबाबत कोणतीही माहिती नाही. वैयक्तिकरित्या, आम्ही कधीही विचारले नाही किंवा कोणी आम्हाला सांगितले नाही. संपूर्ण बिहारच्या विकासासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. आपण एका वेळी एक गोष्ट करत राहतो. असे म्ह्णून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.