BJP’s new formula : भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या वाढीसाठी नेहमीच तरुण, तडफदार कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले आहे. आता याच रणनीतीनुसार पक्षाने त्यांच्या केडरमध्ये आयआय एम आणि आयआयटी या सारख्या मोठ्या संस्थांमधून पासआऊट होणाऱ्या तरुणांना सहभागी करून घेण्याचा विचार करत करत आहे. यासाठी पक्षाकडून नवीन योजना अंमलात आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पक्ष जोरदारपणे काम करत असून ज्या तरुण हुशार व्यावसायिकांना राजकारणात भरती होण्याची इच्छा आहे अशांना या योजनेतून आपल्या पक्षात सहभागी करून घेण्यात येणार आहे.या तरुणांना एखाद्या नेत्याशी संबंध वा पक्षाचा प्रचार व रॅलीत सहभागी होण्याचे बंधन नसेल. पक्षाला असे तरुण व्यावसायिक हवेत जे आपल्या बुद्धिमत्तेने समाज व अर्थव्यवस्थेला नवी दिशा देतील. या पद्धतीने येत्या पाच ते दहा वर्षात पक्षाला नवे स्वरूप दिले जाईल. अशा तरुणांच्या मदतीने पक्ष वेगळा ‘थिंक टँक केडर’ तयार करेल.
सुरुवातीच्या ग्रूमिंग दरम्यान या तरुणांना ५० हजार ते ५ लाखांपर्यंत मासिक स्टायपेंडहीदेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तरुण भविष्यात निवडणूक लढवण्यासोबत खासदार, आमदार वा मंत्री बनू शकतील. पक्षाची संघटना वराहला आयआयएम, आयआयटी सारख्या संस्थासोबत मॅनेजमेंट, वैद्यकीय, पीएचडी, अर्थशास्त्र, पत्रकारिता, जनसंवाद, समाजशास्त्र, राज्यशास्त्र शिकणाऱ्यांना निवडण्याचे काम दिले आहे.
शिक्षणानंतर क्षमतेनुसार त्यांना जबाबदारी दिली जाईल. या तरुणांना भविष्यात पीएमओ तसेच केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, खासदार, आमदार किंवा संघटनेच्या कार्यालयात संधी मिळेल. याठिकाणी त्यांची कार्यपद्धत व योगदानाच्या समीक्षेनंतर राजकारणात थेट प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
गुणपत्र व कागदपत्रांसोबतच संघटना तरुणांची विचारसरणीही तपासणार आहे. यासाठी आरएसएस वा भाजपचे तरुण वा विद्यार्थी शाखेच्या मदतीने त्यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ ठेवला जाईल. तसेच या तरुणांचे मित्र, सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट, सार्वजनिक वागणे, गुन्हेगारी रेकॉर्ड आदी तपासले जाईल. त्यानंतरच निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यातील तरुणांना या योजनेची संधी देण्यात येणार आहे.
पक्ष या तरुणांच्या धोरण व व्यवस्थापनाच्या आघाडीवर असणाऱ्या त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करेल. त्यांना पक्ष- सरकारसाठी योजना व कार्यक्रम बनवावे लागतील. त्यांचे इनपुट्स योग्य, प्रभावी वाटल्यास त्यांना पक्ष व सरकार लागू करेल. या तरुणांना आपल्या ज्ञान, अनुभवाच्या आधारावर विविध माहिती व डेटा विश्लेषण करून एल्गोरिदम बनवावा लागेल, जो पक्ष व सरकारच्या ॲक्शन प्लॅनचा भाग असेल.
निवडणूक प्रचार, मतदारांचे केंद्रीकरण करण्याची जबाबदारी असेल. याआधी आयबीएम व वराहने तरुणांकडून निवडणूक सर्व्हे केला आहे. हे सर्व्हे व डेटाच्या आधारावर प्राप्त महत्त्वाचे इनपुट्सचा भाजपने निवडणूक जाहीरनामा व निवडणूक मुद्दे ठरवण्यासाठी वापर केला आहे. भाजपने वराहला छत्तीसगड निवडणुकीत जबाबदारी दिली होती, त्याचे परिणाम भाजपाला हवे त्यापेक्षाही जास्तच चांगले मिळाले आहेत.